कामगार कल्याण मंडळाकडून ४३ हजार कामगारांना मास्कचे वाटप, कोरोना संसर्गापासून बचावासाठी कामगारांना झाली मदत

परळी दि. ३१ ऑगस्ट २०
कोरोना संसर्गाची लागण कामगारांना होऊ नये व कामगार सुरक्षित राहावेत म्हणून कामगार कल्याण मंडळाने राज्यातील ४३ हजार कामगारांना विनामूल्य मास्कचे वाटप केले आहे.
कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांच्या उत्कृष्ट नियोजनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला व नागपूर या विभागांतर्गत चालणाऱ्या २३० कामगार कल्याण केंद्रातून ४३ हजार कामगारांना मास्क वाटप करण्यात आले.
गेल्या तीन महिन्यापासून कामगारांना मास्कचे वाटप होत आहे. यामुळे कोरोना संसर्गापासून कामगारांना संरक्षण मिळण्यास मदत झाली. बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगारांनाही मास्कचे वितरण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हे सर्व मास्क कामगार कल्याण केंद्राच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वतः तयार केलेले आहे. कामगार मंडळातर्फे दरवर्षी कामगार कुटुंबातील महिला सदस्यांना शिवण कलेचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु यंदा लॉकडाऊनच्या काळात प्रशिक्षण देता आले नाही. म्हणून प्रशिक्षण देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी हे मास्क तयार केले आहे. या सर्व महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांनी केले आहे.
कामगार मंडळाने यापूर्वीही कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी कोवीड-१९ ही डिजिटल मोहीम राबवून कामगारांमध्ये जनजागृती केली आहे.
द्वारा प्रकाशित :
बालाजी नवटके पाटील